उपयोजित लेखन

Day
Night

उपयोजित लेखन

पत्रलेखनासंबंधी थोडी माहिती:
पत्रलेखनाचे प्रकार पत्रलेखनाचे स्थूलमानाने दोन प्रकार:
(१) अनौपचारिक पत्रे
(२) औपचारिक पत्रे.
(१) अनौपचारिक पत्रे:

आई, वडील, भाऊ, बहीण वा इतर कोणी आप्त आणि मित्र यांना उद्देशून लिहिलेली पत्रे, ही अनौपचारिक पत्रे होत. हल्ली संदेशवहनातील प्रचंड क्रांतीमुळे अनौपचारिक पत्रे लिहिण्याची गरज जवळजवळ संपुष्टात आली आहे. त्यामुळे वैयक्तिक स्तरावरील पत्रव्यवहार हल्ली फारच कमी प्रमाणात होतो.

इंटरनेट, संगणक, मोबाइल फोन यांमुळे वैयक्तिक स्तरावरील पत्रव्यवहार मंदावला आहे, हे खरे असले, तरी त्यांच्यामुळे पत्रव्यवहार चालूसुद्धा राहिला आहे. काही वेळा माणसे कामात असतात. संपर्क होऊ शकत नाही. अशा वेळी ई-मेलद्वारे पत्रे पाठवली जातात. किंबहुना आता तंत्रज्ञानाचा प्रभाव व सुलभता यांमुळे ई-मेलचा प्रसार खूपच वाढला आहे. ई-मेलवरील पत्रलेखनाची एक विशिष्ट पद्धत आहे. पारंपरिक पत्रलेखनाहून थोडी वेगळी आहे. ई-मेलवरील पत्रलेखनाचे संकेतही थोडे वेगळे आहेत. यापुढे तंत्रज्ञानाच्या आधारेच पत्रव्यवहार प्राधान्याने होणार असल्याने त्या पद्धतीचा परिचय होणे आवश्यक आहे, म्हणून पत्राचे प्रारूप ई-मेल पद्धतीनुसार स्वीकारले आहे.

या वर्षापासून दहावीच्या अभ्यासक्रमात कौटुंबिक स्वरूपाच्या पत्रांचा समावेश केलेला आहे.

अनौपचारिक पत्र लिहिताना बाळगायची दक्षता :
(१) अनौपचारिक पत्रात एखाद्या व्यक्तीला लिहिलेल्या पत्राचा नमुना तयार करायचा आहे. उदा., अभिनंदनपर पत्र,
(२) पत्राच्या वरच्या बाजूस डाव्या कोपऱ्यात तारीख लिहावी.
(३) पत्राचा विषय लिहिण्याची आवश्यकता नाही.
(४) पत्र कोणत्या व्यक्तीला लिहीत आहोत, हे लक्षात घेऊन मायना लिहावा.

(५) पत्रातील मजकूर लिहिताना योग्य तेथे परिच्छेद पाडावेत.
(६) पत्राचा समारोप योग्य प्रकारे करावा. आईवडिलांना “शिरसाष्टांग नमस्कार’ किंवा ‘शि. सा. नमस्कार’ आणि कुटुंबातील इतरांना सा. न./साष्टांग नमस्कार/नमस्कार/आशीर्वाद यांपैकी योग्य ते शब्द लिहावेत.
(७) समारोपाचा मायना योग्य असावा.
(८) पत्राची भाषा सहज बोलल्यासारखी व घरगुती असावी.

(२) औपचारिक पत्रे :
दैनंदिन जीवनात आपल्या काही अडचणी सोडवण्यासाठी किंवा काही सुविधा मिळवण्यासाठी आपल्याला शासकीय कार्यालयांत किंवा खाजगी कंपन्यांच्या कार्यालयांत जावे लागते. आपली कामे व्हावीत म्हणून या कार्यालयांत आपल्याला पत्रे सादर करावी लागतात. या पत्रांना ‘औपचारिक पत्रे’ म्हणतात.

कधी कधी आपल्याला त्रयस्थ व्यक्तींनाही काही कामानिमित्त पत्र लिहावे लागते. हेही ‘औपचारिक पत्र ‘च होय, आपली कामे कोणालाही त्रास न होता, बिनचूक व त्वरेने होण्यासाठी अशी पत्रे विशिष्ट पद्धतीने लिहिली जातात. त्यांची एक ठरलेली रूपरेषा असते. त्यात शिष्टाचार व उपचार पाळावे लागतात. या पत्रांत पाल्हाळ, फापटपसारा नसतो. कामाचे स्वरुप थोडक्यात व अत्यंत नेमकेपणाने स्पष्ट केलेले असते. मित्रांना किंवा नातेवाईकांना लिहिलेल्या पत्रात जशी सलगी व्यक्त होते, तशी सलगी औपचारिक पत्रात नसते. ही औपचारिक पत्राची वैशिष्ट्ये आहेत.

औपचारिक पत्रांचे स्थूलमानाने पुढीलप्रमाणे काही उपप्रकार मानले जातात:
(१) निमंत्रणपत्र
(२) आभारपत्र
(३) अभिनंदनपत्र किंवा गौरवपत्र
(४) चौकशीपत्र
(५) क्षमापत्र
(६) मागणीपत्र
(७) विनंतिपत्र
(८) तक्रारपत्र

औपचारिक पत्र लिहिताना बाळगायची दक्षता :
(१) पत्राची सुरुवात करताना वरच्या डाव्या कोपऱ्यात दिनांक लिहावा.
(२) प्रेषक व प्रति यांचे पत्ते कृतिपत्रिकेत दिलेले असतील; तर तेच लिहावेत; पत्ते दिलेले नसतील, तर ते काल्पनिक लिहावेत.
(३) प्रेषक व प्रति यांची नावे दिलेली असल्यास तीच लिहावीत.

अन्यथा अ.ब.क, किंवा तत्सम अक्षरे लिहावीत. सही करू नये.

(४) औपचारिक पत्रात ‘मायना’ लिहिल्यावर त्यानंतरच्या
ओळीत ‘विषय’ लिहावा. ‘संदर्भ’ दयायचा असेल, तर तो ‘विषया नंतरच्या ओळीत लिहावा.
(५) त्यानंतरच्या ओळीत आवश्यकतेप्रमाणे ‘महोदय’/’महोदया’ हे संबोधन लिहावे आणि स्वल्पविराम दयावा. (‘मा. महोदय/महोदया’ किंवा ‘माननीय महोदय/महोदया’ असे लिहू नये. फक्त ‘महोदय’/’महोदया’ एवढेच लिहावे.)
(६) त्यानंतरच्या ओळीत मजकुराला सुरुवात करावी.
(७) ‘आपला विश्वासू’, ‘आपला कृपाभिलाषी’ या शब्दांनी शेवट करून त्याखाली आवश्यकतेप्रमाणे अ.ब.क किंवा नाव आणि पत्ता लिहावा. अभ्यासक्रमातील पत्रांचे स्वरूप :

१. कौटुंबिक पत्रे :
आई, वडील, भाऊ, बहीण, अन्य आप्त, मित्रमंडळी वगैरेंना विविध कारणांनी लिहिली जाणारी पत्रे ही कौटुंबिक पत्रे होत. या माणसांशी असलेले नाते आपुलकीचे, जिव्हाळ्याचे असते. प्रत्येक व्यक्तीशी आपला जसा संबंध असतो, तसे पत्र लिहिले जाते. म्हणून ही पत्रे चाकोरीबद्घ नसतात. ती मोकळीढाकळी असतात. तरीही या प्रकारच्या पत्रलेखनाचे काही संकेत निर्माण झाले आहेत. साधारणपणे खुशाली, अभिनंदन, परीक्षा वगैरेंमधील यश, जन्म-मृत्यू यासंबंधीची माहिती अशा अनेक बाबी (ज्याच्या संबंधात संबंधित व्यक्तींना

जिव्हाळा वाटत असतो त्या बाबी) एकमेकांना कळवण्यासाठी, भावनाविचारांची देवाणघेवाण करण्यासाठी पत्रे लिहिली जातात. व्यक्तिगत जीवनातील सर्व बाबी कौटुंबिक पत्रात येऊ शकतात.

२. मागणीपत्र :

एखादया वस्तूची किंवा सेवेची मागणी करण्यासाठी लिहिलेले पत्र म्हणजे ‘मागणीपत्र’ होय, सार्वजनिक जीवनात सौजन्याने वागण्याचे संकेत असतात, म्हणून पत्रात विनंतीची भाषा वापरली जाते. मात्र, पत्राच्या केंद्रस्थानी मागणीच असते. मागणीपत्राची काही वैशिष्ट्ये :
(१) मागणी पुरवणाऱ्याला योग्य तो मोबदला देण्याची आपली तयारी असते.
(२) पैशाच्या बदल्यात वस्तू-सेवा देण्याघेण्याचा रोकडा व्यवहार. त्यात भावनेचा अंश कमी असतो.
(३) वस्तूचा दर्जा चांगला असावा, विक्रीनंतरची सेवा उपलब्ध असावी इत्यादी अपेक्षा असतात.
(४) किंमत वाजवी असावी, अशीही अपेक्षा असतेच.

३. विनंतिपत्र :
(१) एखादया व्यक्तीला किंवा संस्थेला लिहिलेले कोणत्याही स्वरूपातील मदत करण्याची विनंती करणारे पत्र म्हणजे ‘विनंतिपत्र’ होय. मदत करणे हे त्या संबंधित व्यक्तीच्या पूर्णपणे इच्छेवर अवलंबून असते. म्हणून संबंधित व्यक्तीला विनंतीच करावी लागते. मुख्य विषयाबरोबर विनंतीची भावनाही केंद्रस्थानी आहे. म्हणून हे विनंतिपत्र होय.

(२) निमंत्रणे देणे, देणगी मागणे, स्थळभेटीसाठी परवानगी घेणे, एखादया तज्ज्ञ व्यक्तीच्या ज्ञानाचा, व्यासंगाचा, अनुभवाचा लाभ व्हावा म्हणून त्या व्यक्तीला निमंत्रण देणे. अग्निशमनदलासारख्या संस्थांना मार्गदर्शनासाठी बोलावणे, ‘शालेय समिती’मध्ये सहभागी होण्यासाठी नगरसेवक किंवा सरपंच यांना आमंत्रित करणे, विदयाथ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पालकांना आवाहन करणे यांसारख्या प्रसंगांत विनंतिपत्रे लिहिली जातात.

औपचारिक ई-पत्राचा आराखडा

अनौपचारिक ई-पत्राचा आराखडा

पत्रलेखन नमुना कृती:
पुढील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:

१. मागणी पत्र
उत्तर:

दिनांक : ३.११.२०१९
प्रति,
मा. व्यवस्थापक,
आनंद पुस्तकालय,
१०२, विकास नगर, गाळा क्र. २,
जालना.
विषय : पुस्तकांची मागणी करण्याबाबत.
महोदय,
आजच्या वर्तमानपत्रातून आलेले आपल्या पुस्तकालयाचे हॅन्डबिल मी नुकतेच वाचले. आपण या पंधरवड्यासाठी सर्व पुस्तकांवर २०% सवलत देऊ केलेली आहे. मला हव्या असलेल्या पुस्तकांची यादी पुढे देत आहे. कृपया मला २०% सवलत दयावी आणि पुस्तके घरपोच देण्याची व्यवस्था करावी. टपालखर्च मी देईन. मी सदर पुस्तकांची नावे माझ्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातून घेतली आहेत. त्यामुळे त्यांच्या किमती मला ठाऊक नाहीत. तरी सवलत वजा करून येणारी देय रक्कम आणि टपालखर्च ही एकूण रक्कम किती येते, ते कृपया माझ्या या ई-मेलला उत्तर देऊन कळवावे. त्या उत्तरातच आपण आपल्या बँक खात्याचा तपशील कळवला, तर मी ती रक्कम आपल्या खात्यात त्वरित ऑनलाइन भरीन. माझ्या पुस्तकांची यादी :

१. गुजगोष्टी – ना. सी. फडके (व्हीनस प्रकाशन)
२. शब्दांची पहाट – नीलिमा गुंडी (ग्रंथाली प्रकाशन)
कळावे,

आपला नम्र,
अ. ब. क.
११, शुक्रतारा,
जवाहर नगर, जालना – ४३१ २०३.
abc@cox.com

२. विनंतिपत्र
उत्तर :

३ नोव्हेंबर २०१९.
प्रति,
मा, व्यवस्थापक,
आनंद पुस्तकालय,
१०२, विकास नगर, गाळा क्र. २,
जालना – ४३१ २०३
विषय : पुस्तकांवर अधिक सवलत देण्याबाबत.
महोदय,
मी, अ. ब. क, सरस्वती विद्या मंदिर या शाळेचा शालेय भांडार प्रमुख या नात्याने हे पत्र लिहित आहे.

आजच वर्तमानपत्रातून आलेले आपल्या पुस्तकालयाच्या वर्धापनदिनाबाबतचे पत्रक वाचले आणि आनंद झाला. वर्धापनदिनानिमित्त आपण पस्तक खरेदीवर २०% सवलत जाहीर केली आहे. आपले ‘आनंद पुस्तकालय’ आणि आमची शाळा यांचे गेल्या अनेक वर्षांचे ऋणानुबंध आहेत. गेली अनेक वर्षे आपण आमच्या शाळेला लागणारी सर्व प्रकारची पुस्तके पुरवीत आला आहात.

सध्या पुस्तकांच्या किमती बऱ्याच वाढल्या आहेत. शाळेचे अनेक खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. शासनाकडून मिळणारे अनुदान वाढत्या खर्चाला पुरे पडत नाही. अलीकडे देणग्या मिळवणेसुद्धा जिकिरीचे झाले आहे. म्हणून आपल्याला कळकळीची विनंती आहे की, आपण आपल्या वर्धापनदिनानिमित्ताने आमच्या शाळेला पुस्तक खरेदीवर २०% पेक्षा जास्त सवलत दयावी. आम्ही आमची पुस्तकांची यादी चार दिवसांपूर्वीच आपल्याकडे पाठवली आहे.

आपल्या अनुकूल प्रतिसादाची आम्ही वाट पाहत आहोत. सवलत वजा जाता येणारी देय रक्कम कृपया उलट मेलने कळवावी. म्हणजे ती देय रक्कम आम्ही आपल्या बँक खात्यात नेहमीप्रमाणे त्वरित भरू.

हे पत्र मी मा. मुख्याध्यापकांच्या अनुमतीने लिहित आहे. कळावे,
आपला नम्र,
अ. ब. क.
(शालेय मांडार प्रमुख)
सरस्वती विद्या मंदिर,
जवाहर नगर, जालना – ४३१. २०३.
abc@xxxx.com